राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्यांचंही शुद्धीकरण करायला हवे – दीपक केसरकर

मुंबई : २२ जानेवारी – दोन दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत हे जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर शिंदे गट-भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो की ठाकरे गट गोमुत्र शिंपडून ती जागा पवित्र करतात. मात्र, आता राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झालेल्यांचंही शुद्धीकरण करायला हवं, असे ते म्हणाले
काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. मात्र, ज्या काँग्रेसने या कलमाचा पुरस्कार केला, त्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेनं काश्मीरमध्ये जाऊन भेटणं, यासारखा बाळासाहेबांचा घोर अपमान असूच शकत नाही”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. “अनेक ठिकाणी आम्ही गेल्यानंतर ठाकरे गटाचे नेते गोमुत्राने ती जागा पवित्र करतात. त्याऐवजी आता जे लोकं काश्मीरमध्ये जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, त्यांचंही शुद्धीकरण केलं गेलं पाहिजे”, अशी खोचक टीकाही त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता केली. “मला एक दिवसासाठी पंतप्रधान केलं तर मी काश्मीरमधून कलम ३७० रद्द करून दाखवेन, असं म्हणणारे बाळासाहेब कुठे आणि सत्तेसाठी काँग्रेसच्या मागे धावणारे शिवसैनिक कुठे, यावर विचार करण्याची गरज आहे”, असेही म्हणाले.
दरम्यान, १४ फेब्रुवारील राज्यातील शिंदे कोसळेल असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. याबाबत ही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “जी लोक झोपतात, ते लोक स्वप्न बघतात आणि जी लोक काम करतात, ती लोक कायम धावत राहतात. त्यामुळे मुख्यमंत्री रात्री दोन अडीच वाजेपर्यंत काम करतात”, असे ते म्हणाले.

Leave a Reply