शिकार – नंदकुमार वडेर

.”.. ताई मी आता खूप खूप थकलोय गं!
नाही झाली शिकार करणं.
तारुण्यातली रग, उमेद गळून पडली सारी.
.का कुणास ठाऊक सतत तुझी मला फार फार आठवण येत होती..
तुला भेटावं, तुझ्या मायेच्या कुशीत शिरावं आणि पडून राहावं.. किती लळा लावलास तू ताई! मला लहान बछडा असल्यापासून तू सांभाळलस.
.मला माझे गणगोत कुणी असतील असं आठवतं नाही…
नाही म्हणायला तूच कधीतरी मला ते सांगत असायचीस.. काळाचा घाला यावा तसा त्या नराधम शिकाऱ्यांनी आमच्या कुटुंबावर फैरीवर फैरी झाडल्या..
सगळेच्या सगळे बळी पडले आणि वाचलो होतो मी आईच्या कुशीत पहुडलेलो..
त्या शिकाऱ्यांनी मला पाहिलं आणि उचलून घेत गुहेतून बाहेर आले..
तसा मी टणकन खाली उडी घेतली.. माझ्या आयुष्यातील ती पहिली उडी..
मी पळत पळत निघालो.. शिकारी माझ्या मागे येत होता…
आणि तितक्यात ताई तू कुठून तरी अवतरलीस मला तू अलगदपणे तोंडात धरून जंगलात नाहीशी झालीस..
बंदुकीचा चाप ओढण्याची संधी त्यांना मिळालीच नाही..
आणि तु माझा जीव वाचवलास.. तिथून पुढे मी तुमच्या बरोबरच राहू लागलो..
मला तू घेऊन आलेली तुझ्या दादल्याला आवडलं नाही हे त्याचं वेळी मला जाणवलं.
. त्यानं तसं तुला म्हटलं देखील हि पीडा इथं कशाला आणलीस आणि कळून सवरून आपलाच मृत्यू लवकरच का ओढवून घेतेस..
कधी असं झालयं का आजवर वाघाच्या जातीनं आपली शिकार केलेली नाही. तो एक ना एक दिवस आपली शिकार नक्की करणारं..
तेव्हा तू म्हणाली होतीस लहान अनाथ बछडं पाहून माझ्ं आईचं हृदय द्रवलं. मी त्याला सांभाळेन आणि कळता सवरता झाला कि त्याला त्याच्या बिरादारीत सोडेन.
. त्यानं शिकार करणं हा त्यांचा जीवन धर्म आहे, त्याचा तो पाळेल आणि मी एक आई आहे तो माझा धर्म मी पाळेन..
पण तुझ्या दादल्याला ते तितकसं रूचलं नाही तुझ्या पुढे त्याचं काही चाललं नाही..
पहिले काही दिवस तुझ्या अपरोक्ष मला त्रास देऊन हाकलू पाहात होता पण तू मात्र मला सतत जपत असायची.
. तुमच्या कळपातील इतरजण दादल्याच्या सांगण्यावरून त्रास देऊ लागले.. मी तिकडं तुझ्याकडे पाहून दुर्लक्ष केले..
हळूहळू मी वयात येउ लागलो आता मला माझी बिरादारी हवी हवीशी वाटू लागली तसचं तुझ्या कळपातले देखील माझ्यापासून दोन हात लांब राहू लागले..
आणि एक दिवस तूच मला आमच्या बिरादारीच्या वेशीवर सोडून गेलीस.
त्यावेळी तुझे ते पाणावलेले डोळे मी पाहिले..
अगदी संथ गतीने तू निघालीस सारखी सारखी मान वेळावून तू माझ्या कडे पाहात होतीस..
मलाही गलबलून आलं होतं पण डोळयात टिपूसही आलं नाही.. कदाचित नैसर्गिक ती गोष्ट असावी..
अशी जगावेगळी, न भुतो न भविष्यती अशी आपली माय लेकराची जोडी जमली होती..
..माझ्या बिरादारीतल्या लोकांनी मला जवळ केलं नाही..
ते म्हणाले आपल्या बिरादारीत शेळपटांना थारा नाही.
तुला आम्ही बहिष्कृत केले आहे..
तुझा तूला स्वतंत्र राहण्याचा अधिकार आहे..
स्वतःची शिकार , गुहा तुझं असेल आमच्यापैकी कुणीच तुझ्या मदतीला सोबतीला असणार नाही..
तू डरपोक झाला आहेस.
अशी बरीच निर्भत्सना त्यांनी माझी केली आणि तिथून त्यांनी मला बाहेर हाकलं..
आता परत ताई तुझ्याकडे येणं सुज्ञपणाचं नव्हते.
मग मी एकट्याने राहण्याचा निर्णय घेतला.
. गुहेचा प्रश्न सोडवला,
भुक भागविण्यासाठी सगळं जंगल पालथं घालावे म्हणून भटकू लागलो पण पदोपदी माझ्या बिरादारीतल्या लोकांनी हे जंगल आमच्या साठी आहे इथं तुला शिकार करता येणार नाही.. तूला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल..
त्यामुळे मला शिकार करणं मुश्किल झालं.. इकडं भुक खवळू लागली..
एक दिवस गेला दोन दिवस गेले.. दुसऱ्या जंगलात जाण्याचा मी विचार केला.पण ते कुठे असेल किती लांब असेल.. असेल का नसेल याचा काही अंदाज येईना..
बरं तिथवर जाण्यासाठी अंगात ताकद तरी हवी होती..
आधीच दोन चार दिवसाच्या उपासमारीने जीव घायकुतीला आलेला आणि केलेली सततची पायपीटेने शरीर गलितगात्र झालेले..
आता एक तरी अन्नाचा कण पोटात गेल्याशिवाय काही होणे नव्हते..
मी हताश, पेंगळून टेकडीवर बसलो होतो आणि माझी नजर सहज कुरणावर चरणाऱ्या त्या तुमच्या कळपावर गेली..
भूक शमवणे हाच एकच विचार डोक्यात घोळत असताना मागचा पुढचा कोणताच विचार न करता जीवाच्या आकांताने मी धावत सुटलो..
ताई तुला सांगतो मी सुसाट धावत येतोय हे त्यांना दिसले, मग तेही पाच दहाजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.. त्यात एक लंगडत धावताना मला दिसले.. आणि माझी शिकार पक्की झाली..
मी होता नव्हता त्राण आणला आणि त्या भक्ष्यावर झडप घातली..
आपला पाय ओढत जिवाच्या आकांताने पळू पाहणारा तो अखेर माझी शिकार बनला..
मी प्रथम लचक्यावर लचके तोडून काढले बकाबका दोनचार घास गिळले असतील नसतील तोच मला तो चेहरा दिसला… माझी भुकच मेली.. ताई! “
.. ताईनं त्याला मायेनं जवळ ओढलं आपलं तोंड त्याच्या डोक्यावर ठेवलं.. नि डोळ्यांनी आसवांना मुक्त वाहू दिले..

नंदकुमार वडेर, सांगली.

Leave a Reply