चंद्रपूर अपघातातील मृतांच्या परिवाराला ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

चंद्रपूर : २२ मे – चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे डिझेल टॅंकर व लाकडांनी भरलेल्या ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसाहाय्य देण्याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली आहे. अपघातानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मुख्यमंत्री निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्याशी त्यांनी चर्चादेखील केली.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याची विनंती केली. अजयपूर येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

Leave a Reply