तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल – उत्पल पर्रिकर यांच्याबाबत संजय राऊत यांचे विधान

मुंबई : १० जानेवारी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा दिला होता. मात्र, या जागेवरून भाजपा आपल्याला नक्कीच तिकीट देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर गोव्यात निवडणुक लढणारी शिवसेना उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी देणार का याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
“दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणुक जिंकलो आहोत. जर पर्रिकरांच्या कुटुंबाने हिंदुत्त्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल. उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भाजपा रुजवण्याचा प्रयत्न केला. मनोहर पर्रिकरांच्या प्रतिमेमुळे भाजपा गोव्यात टिकली आहे. राजकारणामध्ये धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जमिनीवर चार हात चालत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कधी काळी लोक विचारत होते गोव्यात भाजपाला काय महत्त्व आहे. पण येणार काळ ठरवेल हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना राहते की भाजपा,” असे संजय राऊत म्हणाले.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून तिकीट न दिल्यास काय करणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर बोलण्याची ही वेळ नाही. त्याबद्दल मला आता बोलण्याची गरज नाही, असे म्हटले होते. “मनोहर पर्रिकर यांना आयुष्यात सहजासहजी काही मिळाले नाही. मला त्याच पद्धतीने काम करावे लागेल. मला काही कठीण निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते आणि त्याच्यासाठी शक्ती मिळण्यासाठी प्रार्थना करतो. मला हे निर्णय घ्यावे लागतील. मी पक्षाला सांगितले आहे आणि मला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल. माझा विश्वास आहे,” असे उत्पल पर्रिकर म्हणाले होते.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याबद्दल संजय राऊत यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली होती. तसेच गोव्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या उपस्थितीचा भाजपाला सर्वाधिक फायदा होईल असा दावा केला होता. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधील ‘रोखठोक’ या साप्ताहिक स्तंभात यांनी तृणमूलबाबत भाष्य केले होते. “तृणमूल काँग्रेस काँग्रेससह इतर पक्षांमधील अविश्वसनीय नेत्यांना सामील करत आहे आणि अशी वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Leave a Reply