गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील – राजेश टोपे यांचा सूचक इशारा

जालना : ९ जानेवारी – गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्याबाबत टोपे यांनी माहिती दिलीये. यामध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्यात. मात्र, दारुची दुकानं सुरु असल्यानं विरोधक टीका करतांना बघायला मिळताहेत. त्यामुळं गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा टोपे यांनी दिलाय. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल असं टोपे यांनी म्हटलय.
राज्यात ऑक्सीजनची मागणी नगण्य वाढली असून, दखल घेण्यासारखी ही मागणी नाही, असंही त्यांनी सांगितलं. 18 वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला, असा अहवाल असला तरी आयसीएमआरने याबाबतीत सूचना कराव्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल असही ते म्हणाले. मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. दरम्यान तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.

Leave a Reply