वारंवार धाब्यावर येतात, म्हणून ढाबा मालकाने बेदम मारहाण करून घेतला कुत्र्याच्या पिलांचा जीव

नागपूर : ७ जानेवारी – कुत्र्याचे पिल्लू बदकांचा पाठलाग करतात. खायला वारंवार सुंगत येतात. याचा धाब्याच्या मालकाला राग आला. त्याने कर्मचाऱ्यांना सांगून तीन पिल्लांना बेदम मारहाण केली. यात तीन पिल्लांचा बळी गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झालाय. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
पांजरी टोल नाक्याजवळ ले कर्मा नावाचे रेस्टारंट आहे. अन्न खाण्यासाठी काही कुत्रे तिथं येतात. त्यापैकी एक कुत्री रेस्टारंटच्या मालकानं पाळली. कुत्रीने चार-पाच पिलांना जन्म दिला. ही पिल्ले आता दोन-तीन महिन्यांची झाल्यानं चांगली खेळू लागली होती. त्या पिल्लांचं संगोपण रेस्टारंटचे मालक मयूर नगरारे यांनी केले. पण, त्यांनी दुपारी दिसलेली पिल्ले संध्याकाळी दिसली नाहीत. उलट रक्ताचे डाग दिसले. त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता भयंकर प्रकार समोर आला.
शेजारील समाधान धाब्यावरील तीन कर्मचारी रेस्टारंटमध्ये शिरले. त्यांनी काठीने वार करून तीन पिल्लांना ठार केले. त्यानंतर एक कर्मचाऱ्यानं तीनही पिलांचे मृतदेह कुपणाबाहेर फेकून दिले. त्यानंतर दूर अज्ञात ठिकाणी दफन करण्यात आले.
ही बाब सीसीटीव्हीतून लक्षात येताच मयूर नगरारे हे काही मित्रांना घेऊन संबंधित ढाब्यावर गेले. त्यांना विचारणा केली. पण, कर्मचाऱ्यांनी उलट मयूर यांनाच मारहाण केली. त्यामुळं मयूर यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी मुन्ना शर्मा, स्वप्निल उईके, उल्हास वानखेडे, या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. मालकाच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
कुत्र्यांना अशाप्रकारे अमानवीय पद्धतीनं मारण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशी माहिती सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मोरे यांनी दिली.

Leave a Reply