राऊत हे देशाचे, राज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेच नेते आहेत – चंद्रकांत पाटील

अकोला : ३ सप्टेंबर – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. बेळगाव महापालिकेत आम्ही ३० पेक्षाही जास्त जागा जिंकू, असा दावा खासदार राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या विधानावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. राऊत हे देशाचे, राज्याचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेच नेते आहेत, त्यांना सगळं कळतं, त्यांचा तरअमेरिकेचाही अभ्यास असू शकतो, असा टोलाच चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे.
चंद्रकांत पाटील अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. कोकणात नारायण राणे समर्थकांना शिवसेनेने फोडले आहे, याकडे पाटील यांचे लक्ष वेधले गेले. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, नारायण राणे यांचे समर्थक फोडले की कसे याची मला माहिती नाही. पण जर असे झाले असेल तर नारायण राणे त्यासाठी पूर्णपणे सक्षम आहेत.
पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य करत राज्य सरकारवर टीकेचे प्रहार केले. ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ओबीसींना आरक्षण देणे तसे खूप सोपे आहे, असे सांगतानाच या सरकारला आरक्षण द्यायचेच नसल्याचा थेट आरोपच त्यांनी केला.
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना देण्यात ईडीच्या नोटीस प्रकरणीही भाष्य केले. भाजपने परिवहन मंत्री अनिल परब यांचे नवे घोटाळे बाहेर काढलेले नसून ते जुनेच घोटाळे आहेत, असे पाटील म्हणाले.
बेळगाव महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवाच फडकेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. बेळगाव महानगरपालिकच्या ३० जागा आम्ही जिंकू आणि बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असे राऊत यांनी म्हटले होते.

Leave a Reply