सीबीआय आणि ईडीचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी – राजू शेट्टींचा आरोप

मुंबई : २ जुलै – साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं सील केल्यानंतर एकच राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषद घेते सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.
सीबीआय आणि ईडी या केंद्राच्या हातात आहे. या एजन्सीचा वापर हा राजकीय ब्लॅकमेलिंग करण्यासाठी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केली आहे. इतकंच नाहीतर तर ‘एका काय सर्व ४३ कारखान्यांवर कारवाई व्हायला हवी. या कारखान्यांच्या विक्रीबाबत चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी कारखान्यांची चौकशी करायची आणि मग भाजपमध्ये घ्यायचं हे चुकीचं आहे. कारण हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत’, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ईडी राजकीय दृष्ट्या काम करत आहे. सर्व पक्षातील नेत्यांनी कारखाने लुटल्याच्या अनेक तक्रारी मी केल्या आहेत. ४३ कारखान्यांची लिस्टही ईडीकडे दिली आहे. पण तेव्हा यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण ईडीची आता कारवाई म्हणजे त्यांना कोणीतरी सांगत आहे. एखाद्या माणसाचा त्रास होत असेल तर त्याचा काटा काढण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

Leave a Reply