तौक्ते वादळपीडितांना त्वरित मदत द्या – प्रविण दरेकरांची मागणी

मुंबई:३० जून- तौक्ते वादळात महाविकास आघाडी सरकारने मदतीची घोषणा केली, पण अद्यापही मदत केलेली नाही. मत्स्य व्यवसायाला मत्स्यशेती म्हणून व मच्छीमार शेतकरी म्हणून मान्यता दिल्यास त्यांना पीक कर्ज व शेतकऱ्यांच्या सुविधा, सवलती मिळतील. मच्छीमारांना दिलासा मिळेल, यादृष्टीने राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शिवसेनेवर टीका करीत प्रविण दरेकर म्हणाले, मच्छीमार समाजाने नहेमीच शिवसेनेला निवडणुकांमध्ये भरभरून मतं दिली. या समाजाने शिवसेनेच्या पालख्या वाहिल्या. मात्र शिवसेनेने याच कोळी बांधवांना वाऱ्यावर सोडले. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेला मच्छीमार बांधवांचा विसर पडला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री असताना आजही मच्छीमारांना मदत मिळत नाही, त्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत यासारखे दुर्दैव नाही.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना मच्छीमार समाजासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो व त्यांच्या समस्या सोडवल्या, परंतु महाविकास आघाडी सरकारकडे मच्छीमार समाजासाठी वेळ नाही. महविकास आघाडीमध्ये असलेल्या कुरघोडी सोडविण्यातच त्यांचा वेळ जात आहे. राज्य सरकारला जनतेशी व त्यांच्या प्रश्नांशी काही घेण देणं नाही आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.

Leave a Reply