निवडणुका रद्द करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं निवेदन

मुंबई: २५ जून –जिल्हा परिषदेच्या निवडणुका रद्द कराव्यात या मागणीसाठी भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयुक्त यू, पी. मदान यांची आज शुक्रवारी भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुका रद्द करण्याची मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेऊ नका, या मागणीसाठी आम्ही यूपीएस मदान यांना भेटलो. मात्र तरीही या निवडणुका थांबणार नाही असंच सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत त्यांना निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत”.
मुख्य आयुक्तांना या निवडणुका घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. याच धर्तीवर जर महाराष्ट्र सरकार न्यायालयात गेलं तर या निवडणुका थांबू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीताराम कुंटे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. तरच या निवडणुका थांबवता येतील, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारला खरंच ओबीसींची चिंता असेल, तर निवडणुकांसंदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा. भाजपकडून २६ जूनला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन एका दिवसात थांबणार नाही, तर दररोज आंदोलन होत राहतील, असंही बावनकुळेंनी सांगितलं.

Leave a Reply