चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळली

अमरावती : ११ जून – नाल्याच्या पुलावरील पाणी वाढल्यामुळे व चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी सरळ नाल्यात कोसळल्याची घटना चांदूर रेल्वे ते पळसखेड मार्गावर दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये टवेरातील चालकासह अमरावती येथील बिसमोरे कुटूंबातील ६ लोकांचे प्राण वाचले आहे.
चांदूर रेल्वे शहरासह ग्रामीण भागात दुपारी १२.३० वाजतापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी – नाले तुडूंब वाहायला लागले. याचवेळी अमरावतीच्या चपरासीपुरा येथील कुणाल बिसमोरे यांच्या परिवारातील ५ सदस्य व चालक असे ६ लोक एमएच २६ व्ही २२८५ क्रमांकाच्या गाडीने अमरावती वरून वर्धाकडे जात होते. मार्गातल्या पळसखेड येथील ओम साई कंपनी जवळच्या नाल्यातले आणि रस्त्याचे पाणी समान झाल्यामुळे चालकाचा अंदाज चुकला आणि गाडी सरळ नाल्यात कोसळली. गाडी डूबत असल्याचे लक्षात येताच कंपनीतील कर्मचारी व काही मजुर धावून आले व त्यांनी गाडीतील ४ पुरूष व २ महिला अशा ६ लोकांना बाहेर काढण्यास मदत केली. सर्वांचे प्राण वाचले. त्यानंतर पाण्यात अडकलेली गाडी पाणी उतरल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.
जीवाची पर्वा न करता पाण्यात कोसळलेल्या गाडीतील ६ लोकांचा जीव पाईप कंपनीतील कर्मचारी निकीता श्रीवास, शुभम माने, पियूष बोबडे, सुयेश चौधरी, श्रेयश चौधरी व मजुरांनी वाचविला. ते वेळेवर पोहचल्याने सर्वांचा जीव वाचला त्यामुळेच ‘ते’ देवदूत ठरले आहे.

Leave a Reply