कोरोनाच्या पुढच्या लाटेत तरी देशवासियांचे हाल होणार नाही याची काळजी घ्या – नाना पटोले यांचा टोला

यवतमाळ : १० जून – कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. आई-वडिलांच्या मृत्युमुळे चिमुकल्यांचे बालपण करपले. हे सर्व दुसऱ्या लाटेत घडले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारने निष्काळजीपणा केला. त्यापासून धडा घेऊन किमान दुसर्या लाटेत तरी देशवासीयांचे हाल होणार नाही, याची दक्षता केंद्राने घ्यायला पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही, असा आरोप कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे केला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार व राज्यातील विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार कुणाल पाटील, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री वसंत पुरके, मध्यवर्ती बँक अध्यक्ष टिकाराम कोंगरे, किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाव वाढत असताना केंद्र सरकार बोलायला तयार नाही. काँग्रेसने आंदोलन करून महागाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. कोरोनात लोकांच्या अंगातील रक्त काढले. नागरिक संकटात असताना दिलासा देण्याचे सोडून महागाई वाढवून हाडातील रक्तही काढले जात असल्याने कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला.
कोरोनाची दुसरी लाट धडकणार असल्याचे ऑक्टोबरमध्येच सांगण्यात आले होते. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली. लगेच पाच राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान दंग झाले. दुसर्या लाटेत इंधनाचे भाव वाढवण्यात आले. महागाई वाढवून जनतेचे शोषण केले गेले आणि त्यानंतर काय तर फक्त अर्शू गाळले गेले, असा टोला पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. देशात सत्ताधारी आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून समाजासमाजांत भांडण लावून वाद निर्माण केले जात आहेत. मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न जटिल केला जात आहे. मूळ विषयावर विरोधक बोलत नाहीत. अंधारात सरकार बनविणारे खरे जातीयवादी आहे. संविधानाचा आत्मा न्यायव्यवस्था आहे. सत्ताकाळात काँग्रेसने कधीही सुप्रीम कोटार्ला प्रश्न केले नाहीत. केंद्र सरकार संविधानच संपवायला निघाल्याचे पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. सरकारमध्ये कुठलाही वाद नाही. विधानसभा अध्यक्ष असताना आपण केलेले काम जनतेने बघितले आहे. प्रदेशाध्यक्ष असतानाही उत्साह कायम आहे. काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचे गटतट नाही. आगामी २0२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply