पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले कंट्रोल रूममध्ये

मुंबई : ९ जून : पहिल्याच पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर योग्य त्या सूचना प्रशासनाला दिल्या.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. दुपारी 3.10 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही सकाळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. ‘4 तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल. आज एकाच वेळी हायटाईड, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबले आहे. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर आम्ही आढावा घेतली आहे. १९५ मिली, १३७ मिली पाऊस झाला आहे. ९५ मिली पाऊस झाल्यास अंडरवॉटर पाणी डायव्हर्ट होतो. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. कुठे निष्काळजीपणा होत असेल तर कारवाई करू, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

Leave a Reply