आगामी ८ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी संघटन मजबूत करावे – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ३० मे – येत्या काही महिन्यात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी संबंधित राज्यातील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्यांनी संघटन मजबूत करावे, असे आवाहन अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

अ. भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय महासचिव व राज्याच्या प्रभारींची आनलाईन व्ही.सी.बैठक पार पडली.

अध्यक्षस्थानी अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत होते. यावेळी बोलताना डॉ. राऊत यांनी कोरोना काळात अनुसूचित विभागाच्या पदाधिकार्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तेलंगणा राज्याच्या पदाधिकार्यांनी रुग्णवाहिका व ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करून रुग्णांना वेळीच मदत केल्याबद्दल तेलंगणा राज्याचे अध्यक्ष प्रितम नगारीगारी यांच्या कामाचे अभिनंदन केले. अनुसूचित जाती विभागाने नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. तामीळनाडू राज्यात अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष असलेल्या सेलवापुरूनथलाई यांची तामीळनाडू विधानसभा नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. यावेळी डॉ. राऊत यांनी विविध राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकींच्या निकालाचाही आढावा घेतला.

येत्या काही महिन्यात ८ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. या राज्यांमध्ये सुद्धा अनुसूचित जातीच्या विभागाला मोठी भूमिका बजावावी लागणार आहे. राष्ट्रीय पातळीवर अनुसूचित जाती विभागाच्या पदाधिकार्यांची काँग्रेस हायकमांडकडून दखल घेतली जात आहे. यामुळे हरीयाणा येथील प्रदीप नरवाल यांची अ. भा. काँग्रेस समिताच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यावेळी प्रदीप नरवाल यांचे अभिनंदन करण्यात आले.
आगामी काळात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपल्या विभागाला प्रयत्न करावयाचे असल्याचे सांगून डॉ. राऊत म्हणाले, मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षांच्या काळात अनुसूचित जातीच्या नागरिकांवर सर्वाधिक अन्याय व अत्याचार झाले आहे. या लोकांचे प्रश्न मांडणे आपले कर्तव्य आहे. कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा सर्व राज्यांच्या प्रभारींनी तयार करावा. हा अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.
यावेळी राजस्थान व छत्तीसगड राज्याचे प्रभारी असलेल्या राजाभाऊ करवाडे यांनी राजस्थानचा अहवाल सादर केला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये राजस्थानमधील ३ पैकी २ मतदारसंघात काँग्रेसने विजय संपादन केला तसेच काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाल्याचेही त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी गुजरात व मध्यप्रदेश राज्यांचे प्रभारी असलेले अनिल नगरारे यांनी गुजरातमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला ८ मतदारसंघांमध्ये मिळालेल्या विजयाचा अहवाल सादर केला. मध्यप्रदेशमध्ये दमोह पोटनिवडणुकीत यश मिळाले आहे. या दोन्ही राज्यांच्या प्रदेश अध्यक्षांनी अनुसूचित विभागाच्या पदाधिकार्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीचे संचालन अनुसूचित जाती विभागाचे सचिव चंद्रसेन राव यांनी केले तर या बैठकीत राष्ट्रीय समन्वयक रविंद्र दळवी, सुरेश कुमार, गोपाल देनवाल, राजकुमार कटारीया, प्रदीप नरवाल, क्षितीज अड्याळकर, हितेंद्र पिथाडीया, प्रमोद कुमार, श्रीमती पूनम पासवान यांनी तर अनुसूचित जाती विभागाचे राज्य प्रमुख असलेले डॉ. धनेश पटीला (छत्तीसगड), एफ.एच. जक्कापन्नवर (कर्नाटक), के. सेल्वापेरुथगाई (तामीळनाडू), बांकानिधी बेहेरा (ओडीसा), राजेश कुमार (बिहार), अशोक प्रसाद (उत्तरप्रदेश) व राजकुमार (उत्तराखंड) यांनीही आपले विचार व भूमिका मांडली.

Leave a Reply