चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्न बघण्याचा छंद, त्यावर मी काय बोलणार? – जयंत पाटील यांचा सवाल

पुणे : २८ मे – महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?; अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. राज्य सरकार अधिवेशन का घेत नाही, याचं कारण जगजाहीर आहे. राज्य सरकारने अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असं चंद्रकांतदादा म्हणतात. मग पंतप्रधानांनाही लोकसभेचं अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही यावर चर्चा होऊ शकते, असा चिमटा जयंत पाटलांनी काढला. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी लॉकडाऊनवरही भाष्य केलं. लॉकडाऊनबाबत वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वेगवेगळी रणनीती ठरवावी लागेल. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. पण परिस्थिती थोडी बरी आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही ते म्हणाले.
पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही वाद नाहीत. कोर्ट, कचेरी आणि कायद्याच्या स्तरावर काही निर्णय झाले आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजितदादा पदोन्नतीतील आरक्षणाच्या विरोधात असल्याचं चित्रं रंगवलं जात आहे. काही लोक हे काम करत असून हे दुर्देवी आहे. या मुद्दयावरून सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. याबाबत कायद्याचा अभ्यास करून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply