१३ नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पोलिसांचे जल्लोषात स्वागत

गडचिरोली : २३ मे – गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत संपूर्ण कसनसुर दलमच्या १३ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांच्या सी-६० दलाला यश आले. ही शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जाबाज सी-60 कमांडोचे गडचिरोली पोलिस मुख्यालयात आगमन झाले तेव्हा बँड पथकाच्या गजरात फटाके उडवत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पैदी जंगलात झालेल्या चकमकीत ६ पुरुष आणि ७ महिला असे १३ जहाल नक्षलवादी ठार झाले. या तेराही जणांवर तब्बल ६० लाख रुपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते. या १३ जणांवर खून, जाळपोळ, चकमक असे विविध गुन्हे दाखल होते. ते तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून खंडणी वसूल करणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून सी-६० कमांडोंनी नक्षलवाद्यांना घेरलं आणि त्यांचा खात्मा केला. या शौर्य पूर्ण कामगिरीचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही काल गडचिरोली येथे येऊन जवानांचे कौतुक केले. जवान अभियान राबवून गडचिरोली पोलिस मुख्यालयात दाखल झाले. तेव्हा पोलीस दलातर्फे बँड पथकाद्वारे मिरवणूक काढून फटाके उडवण्यात आले. यावेळी पोलिस मुख्यालयातील बहुसंख्य पोलिस जवान तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply