आठवड्याभरात मदत वाटप सुरु होईल – विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन

सावंतवाडी : २३ मे – तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत. घरांच्या नुकसानीचे पूर्ण होत आले असून फळबागायतींचे पंचनामेही दोन-चार दिवसात पूर्ण होतील. मदतीसाठी हात आखडता न घेता सढळ हाताने मदत करण्याची भूमिका सरकारची आहे त्यामुळे आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल, असे आश्वाासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवबाग येथे बोलताना केले.
तौक्ते चक्रीवादळात मालवण तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवबाग गावाला भेट दिली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी अध्यक्ष विकास सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी देवबाग येथील खाडी किनारी असलेल्या झाडे व खाडीचे पाणी घुसून नुकसानग्रस्त झालेल्या अरविंद खवणेकर यांच्या घराला भेट देत पाहणी केली. मंत्री वडेट्टीवार यांनी ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्याकडून वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तर त्यानंतर देवबाग मोबारवाडी येथील समुद्राच्या उधाणात उध्वस्त झालेल्या बंधाऱ्याची पाहणी केली.
यावेळी मंत्री वडेट्टीवार म्हणाले, गतवर्षीच्या वादळात सरकारने निकष बदलून मदत दिली होती. यावेळीही कोणालाही नाराज न करता मदत देणार असून याबाबत कॅबिनेटमध्ये विषय उपस्थित केला जाईल. मालवण, वेंगुर्ला, देवगड या तालुक्यामध्ये वादळाचा मोठा फटका बसला असून याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. कोकण वासीयांच्या मागे खंबीर उभे राहण्याची भूमिका मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाची आहे. त्यामुळे मदतीत हात आखडता घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

Leave a Reply