काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही – अतुल भातखळकर यांचा आरोप

मुंबई : १८ मे – टूलकिट प्रकरणावरुन कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपाने कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर आरोप केले. संकटातही कॉंग्रेस राजकारण करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला बदनाम करण्यासाठी कॉंग्रेसने एक टूलकिट तयार केले असल्याचे संबित पात्रा म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी कॉंग्रेवर गंभीर टीका केली आहे.
“काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस, असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते”, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.
“भारताचा नंबर 1 शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा 2008 पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी करोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?”, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.
महामारीच्या वेळी कॉंग्रेसने ‘टूलकिट’ च्या माध्यमातून सरकारला घेराव घालण्यासाठी अनेक मार्गांनी देशात गोंधळ निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी महामारीचा उपयोग पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला डागाळण्याची संधी म्हणून केला. करोनातील नव्या व्हायरसचे नाव मोदी व्हायरस ठेवण्याच्या सूचना कॉंग्रेस कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. कॉंग्रेसने परदेशी पत्रकारांच्या मदतीने भारताची बदनामी करण्याचे कसलाही कसूर सोडली गेली नाही.
याप्रकरणी काँग्रेसनं पलटवार करत भाजपाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव गौडा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भाजपा प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

Leave a Reply