वर्क फ्रॉम होम करणारे मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? – भाजपचा सवाल

मुंबई : १७ मे – अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील वादळ परिस्थितीचा, बचाव व मदतकार्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार? कोकण, मुंबईवर वादळ आले, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, घरे पडली, झाडे कोसळली, रस्त्यांवर पाणी… त्यातच करोनाचे संकट आणि मुख्यमंत्री घरात बसलेत.” असं केशव उपाध्येंनी ट्विट केलं आहे.
तसेच, “अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षात भेट देऊन पाहणी तरी केली, करतात पण मुख्यमंत्री कधी दिलासा देणार? असा देखील सवाल उपाध्येंनी केला आहे.
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गिरगावला मांडवाला आग लागण्याचा घटना अथवा पावसाने मुंबईला झोडपण्याची घटना असो, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत तेथून हालले नव्हते. इथे लोकांना वर्क फ्रॉम होम करा सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वःताच इतकं मनावर घेतलं आहे की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालयसुध्दा आहे हे कधी लक्षात येणार?” असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.
याचबरोबर “महाराष्ट्रात एका होम मिनिस्टरने जनतेचा विश्वास कधीच धुळीस मिळवला. मुख्यमंत्री तर ‘वर्क फ्रॉम होम मिनिस्टर’ झाले आहेत. जनता संकटाशी मुकाबला करत असताना वर्क फ्रॉम होम मिनिस्टरने किमान ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ तरी करून दाखवावे.” असा टोला देखील केशव उपाध्येंनी लगावला आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौते वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच मुंबई महापालिका आयुक्तांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली. तसेच बचाव व मदतकार्यासाठी पूर्वतयारीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply