नागरिकांनी पॉझिटिव्ह राहूनच कोरोनाचा मुकाबला करायला हवा – डॉ. मोहन भागवत

नागपूर : १६ मे – जनता आणि सरकार बेफिकिर राहिल्यामुळेच करोनाची दुसरी लाट आली. मात्र, आता नागरिकांनी पॉझिटीव्ह राहूनच या संकटाचा मुकाबला करायला हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ‘पॉझिटीव्ह अनलिमिटेड’ या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.
सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले, पहिल्या लाटेनंतर सरकार आणि जनता बेफिकीर झाली होती. आता आपल्याला पॉझिटीव्ह राहावे लागेल. स्वत:ला कोव्हिड निगेटिव्ह ठेवण्यासाठी सावधान राहावे लागणार आहे. तसेच सध्याची परिस्थिती पाहता तर्कहीन वक्तव्येही टाळावी लागणार आहेत. ही परीक्षेची वेळ आहे. मात्र, सर्वांना एकजूट राहावे लागेल. एक टीम म्हणून काम करावे लागेल. करोना संकटात यश येणे आणि अपयश येणे हा शेवट नाही. आपल्याला प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकार, प्रशासन आणि जनता बेफिकीर झाले होते. त्यामुळे आपणास या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आता करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण घाबरून जाऊ नका. आपण स्वत:ला तयार केले पाहिजे’, असेही डॉ. भागवत म्हणाले.
करोना हे मानवतेवरील संकट आहे. आपल्याला या संकटाचा सामना करून जगासमोर उदाहरण निर्माण करायचे आहे. एकमेकांचे गुणदोष काढण्यापेक्षा एक टीम म्हणून काम केले पाहिजे. गुणदोष काढण्याचे काम नंतरही करता येईल. मात्र, सध्या टीम म्हणून काम करत या संकटावर मात करायला हवी, असा मंत्रही डॉ. भागवत यांनी यावेळी दिला.

Leave a Reply