काँग्रेस नेते कोविड लढाईसंबंधी चुकीची माहिती फैलावतात – जे. पी. नड्डा यांचा आरोप

नवी दिल्ली : ११ मे – भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना एक चार पानी पत्र लिहिलंय. या पत्रात नड्डा यांनी कोविड मुद्यांवर नकारात्मक प्रचार करण्याचा आरोप काँग्रेसवर केलाय. मी अतिशय दु:खानं हे पत्र लिहित आहे, कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री कोविड लढाईविषयी चुकीची माहिती फैलावत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जे पी नड्डा यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
काँग्रेसचे काही लोक चांगलं काम करत आहेत परंतु, अधिकांश ज्येष्ठ नेते नकारात्मता फैलावण्यात व्यग्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च २०२० पासूनच करोनाविरुद्ध लढाई लढत आहेत. ते सतत मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत तसंच अनेक बैठकाही त्यांनी घेतल्या आहेत. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं आहे, असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
जेव्हा देशातील शास्त्रज्ञ गतवर्षी लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांसह आपल्या पक्षाच्या नेते मात्र त्यांची खिल्ली उडवत होते. काँग्रेसनंच देशातील जनतेत लस घेण्याविषयी संकोच निर्माण केला आणि वाढवला. देशात लसीच्या बाबतीत एव्हढी साशंकता कधीच नव्हती. परंतु, या साथीच्या आजारा दरम्यान हा प्रकार घडला. एप्रिल महिन्यातच कॉंग्रेसच्या नेत्यांकडून लसीकरण मोहिमेचं विकेंद्रीकरण करण्याची मागणी केली जात होती, असा आरोप करतानाच कॉंग्रेस कार्यकारी समितीचे नेते त्या नेत्यांशी संवाद साधत नाहीत का? असा खोचक प्रश्नही नड्डा यांनी सोनिया गांधी यांना विचारलाय.
भारत सरकारनं लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात राज्यांना १६ कोटी लसीचे डोस दिले. आताही ५० टक्के लस मोफत दिली जात आहे, असा दावाही नड्डा यांनी या पत्रातून केला.
भारतात तयार करण्यात आलेली लस ही कोणत्याही एका पक्षाची नाही. ती देशाची आहे. पंतप्रधान केअर्स फंड अंतर्गत ४५ हजार व्हेंटिलेटर पाठविण्यात आले होते. काही राज्यांमध्ये ते उघडलेच नाहीत हे पाहून दु:ख होतं. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची वर्तवणूक क्षुल्लक गोष्टींसाठी नेहमीच लक्षात ठेवली जाईल. कधी लॉकडाउनला प्रतिकार करणं तर कधी समर्थन करणं. केरळमध्ये प्रचंड निवडणूक रॅली काढणं आणि इतर राज्यांत अशा रॅलीला विरोध दर्शवणं, जेव्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत होती तेव्हा आपल्या पक्षाचे नेते उत्तर भारतात सुपर स्प्रेडर रॅली करताना दिसले. अशा गोष्टी जनतेच्या स्मृतीतून पुसून टाकणं इतकं सोपं नाही. फेब्रुवारी आणि मार्च मधील आकडेवारीमधून कोणती राज्य करोना संक्रमण रोखण्यात अपयशी ठरली, हे स्पष्टपणे दिसून येतं. पंजाबमध्ये मृत्यूचे प्रमाण इतके जास्त का असावं? हा प्रश्न तुम्ही तुमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असा टीकेचा सूर जे पी नड्डा यांनी या पत्रातून लावलाय.

Leave a Reply