अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचा सहभाग महत्त्वाचा – नितीन गडकरी

नागपूर : २१ एप्रिल – देशातील सर्वच क्षेत्रांत आयातीला स्वदेशी पर्याय निर्माण करणे, निर्यात अधिक वाढविणे, मागास भागाचा विकास, रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे, गरिबी हटविणे, जैविक इंधनाचा वापर, जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था निर्माण करणे म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मजबूत भारत निर्माण करणे, हाच आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्याकडे जाणारा मार्ग आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
‘वेदांता’ एमएसएमई कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत मिशन या विषयावर ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले, मागास भागाचा विकास आणि उद्योजकता अधिक महत्त्वाची आहे. देशात सर्व प्रकारचे नैसर्गिक स्रोत उपलब्ध असताना अनेक क्षेत्रात अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते व विविध प्रकारच्या वस्तूंची आयात करावी लागते, हे दुर्दैवी आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचा सहभाग महत्त्वाचा आहे. एमएसएमईचा जीडीपी ३० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर, निर्यात ४८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर आणि पाच वर्षात ५ कोटी रोजगार निर्मितीचे आमचे लक्ष्य आहे. त्याद़ृष्टीने शासनाची वाटचाल आहे.
नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधनाच्या माध्यमातून उत्पन्न कसे वाढवावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, आमच्याकडे डॉक्टर आहेत, अभियंता आहेत, शास्त्रज्ञ आहेत, असे असताना अनेक क्षेत्रांत आम्ही मागे आहोत. आत्मनिर्भर भारताकडे जायचे असेल तर आपली अर्थव्यवस्था जगातील पहिल्या क्रमांकाची करावी लागेल. पाणी, ऊर्जा, वाहतूक आणि संवाद या चारही गोष्टी असताना मागास भागाच्या विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. क्रूड तेलाची आयात संपवायची आहे. स्वदेशी जैविक इंधन निर्मितीला शासनाने परवानगी दिली असताना इथेनॉल, बायो इथेनॉल निर्मिती करणे आवश्यक आहे. आपल्या देशात गहू, साखर, तांदूळ, मका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असताना आपण इथेनॉल का बनवीत नाही, असा प्रश्नही नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.
ई-व्हेईकलप्रमाणेच शासन आता ई महामार्ग बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून नितीन गडकरी म्हणाले, दिल्ली-डेहराडून, दिल्ली-हरिद्वार आता दोन तासांत पोहोचता येईल असे महामार्ग आम्ही बनवीत आहोत. ग्रामीण उद्योगांमध्ये रोजगाराच्या खूप क्षमता आहे. ग्रामीण उद्योग बळकट केले तर रोजगार वाढेल व गरिबी हटविता येईल. सध्या कोविडमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. अशा स्थितीतही आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply