केंद्र सरकारने राजकारण करुन महाराष्ट्रावर अन्याय करु नये – बाळासाहेब थोरात

मुंबई : १९ एप्रिल – रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु असून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकार व केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.
‘पियूष गोयल महाराष्ट्राने ऑक्सिजनची मागणी कमी करावी, असे सांगतात. मागणी कमी करा म्हणजे काय? ऑक्सिजनची गरज आहे हे गोयल समजू शकले नाहीत. ते महाराष्ट्राचं प्रतिनिधी करतात. रेल्वे तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग करुन या मातीचे ऋण कसे फेडता येईल ते पाहावं,’ असा टोला बाळासाहेब थोरात यांनी गोयल यांना लगावला आहे.
‘करोना माहामारी हे संकट आहे. या संकटकाळात कोणीही राजकारण करु नये. राजकारण जनतेच्या कल्याणासाठी असले पाहिजे. सर्वसामान्य जनता जगली कर राजकारण करता येईल. लोकचं राहिली नाही तर कसले राजकारण करणार?, केंद्र सरकारने राजकारण करुन महाराष्ट्रावर अन्याय करु नये,’ असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला आहे. ‘फडणवीसांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राला मदत करण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर, ‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केलं आहे. रेमडेसिवीरचा साठा राज्याला मिळावा म्हणून त्यांनी मदत करायला हवी होती. भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठिशी घालणं योग्य नव्हतं. ही कंपनी गुजरातमध्ये काळाबाजार करताना पकडली गेली आहे. फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी सरकारला व जनतेला मदत करण्यासाठी पुढं यावं. त्यांनी दिल्लीत जावून बसले तर रेमडेसिवीर व ऑक्सिजन मिळवण्यासाठी खूप मदत करु शकतात पण दुर्दैवानं ते पोलिस स्टेशनला जाऊन बसतात,’ असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

‘रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई आहे आणि त्यामध्ये लोकांना मदत झाली पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. निर्यात थांबवली तर तो साठा प्रत्येक जिल्ह्यात त्या प्रमाणात गेला पाहिजे. यावर सरकारचं नियंत्रण हवं, कोणत्या पक्षाचं नाही. रेमडेसिवीर सरकारला दिलं पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवता येईल,’ असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.

Leave a Reply