एकनाथ खडसे यांनी सोडले केंद्र सरकारवर टीकास्त्र


जळगाव : १८ एप्रिल – केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला साठा उपलब्ध झाला असता. परंतु आपल्याकडे टंचाई असताना केंद्राने निर्यात सुरू ठेवली होती. म्हणूनच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. खडसेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. ‘विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही,’ असा बोचरा टोला त्यांनी हाणला.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज रविवारी दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या ठिकाणी उपस्थिती लावल्यानंतर खडसे माध्यमांशी बोलत होते. ‘राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध झाला असता. केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आता निर्यातबंदी झाली आहे. त्यामुळे लवकरच साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने करोनाच्या या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खडसे यांनी जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला; मग तो किल्लारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही’, असा टोलाही खडसे यांनी लगावला.

‘फडणवीस हे सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल अशा वल्गना करत आहेत. आपले कार्यकर्ते टिकून राहावेत म्हणून फडणवीस हा आटापिटा करत आहेत. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसे यांनी हाणला.

Leave a Reply