देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात – जयंत पाटील यांची टीका

बेळगाव : १६ एप्रिल – ‘देवेंद्र फडणवीस नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रात आम्हाला याचा प्रत्यय येत असतो. आताही बेळगावातील पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करून त्यांनी पुन्हा एकदा मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचं काम केलं आहे,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज केला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार असलेल्या शुभम शेळके यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच इथल्या मराठी जणांना व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. त्याच अनुषंगाने शुभम शेळके यांनाही पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अनेक वेळा मराठी जणांच्या हक्कासाठी या भागात आंदोलनं केली आहेत. महाराष्ट्राची, मराठी जणांची एकजूट कायम राहावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहतो, हा पाठिंबाही त्याचाच भाग असल्याचं ते म्हणाले.
पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘मागील पाच वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. शिवाय आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झालं आहे,’ असं पाटील म्हणाले.
फडणवीस हे नेहमीच दिल्लीश्वरांना खूश करण्यात व्यस्त असतात, दिल्लीला जे बरं वाटेल तेच ते करतात. महाराष्ट्रातही आम्हाला त्याचा प्रत्यय येतो. करोना असेल, राज्यातील बाकी मागण्या असतील त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही,’ असं पाटील म्हणाले.

Leave a Reply